२०० हून अधिक उड्डाणे रद्द   

१८ विमानतळ तात्पुरते बंद
 
नवी दिल्ली/मुंबई : पहलगाममधील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय संरक्षण दलांनी पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली असून श्रीनगरसह १८ विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.
 
एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि काही परदेशी विमान कंपन्यांनी त्यांच्या सेवा तात्पुरत्या रद्द केल्या आहेत.देशाच्या वायव्येकडील किमान १८ विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. या विमानतळांमध्ये श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चडीगढ, जोधपूर, जैसलमेर, सिमला, धर्मशाला, जामनगर यांचा समावेश आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
इंडिगोने हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे १० मे रोजी पर्यंत अमृतसर आणि श्रीनगरसह देशांतर्गत १६५ हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. इंडिगोकडून दररोज २,२०० हून उड्डाणे केली जातात. जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंडीगढ आणि राजकोट या विमानतळांवरून ये-जा करणारी  एअर इंडियाची उड्डाणेदेखील १० मे पर्यंत होणार नाहीत. 
 
स्पाइसजेटनेदेखील धर्मशाळा, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील काही भागांमधील विमानतळावरील उड्डाणे पुढील सूचना येईपर्यंत बंद केली आहेत. देशातील सर्वात मोठे आणि व्यस्त विमानतळ असलेल्या दिल्ली विमानतळावर रात्री १२ पासून किमान ३५ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, असे सूत्रांनी सांगितले. यामध्ये २३ देशांतर्गत आणि परदेशातून येणार्‍या ८ विमानांचा समावेश होता.अमेरिकन एअरलाइन्ससह परदेशी विमान कंपन्यांनी दिल्ली विमानतळावरील त्यांच्या काही सेवा रद्द केल्या आहेत. अकासा एअरनेदेखील त्यांची काही उड्डाणे रद्द केली आहेत.  
 

Related Articles